संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज काही दिवस शेगांव मध्ये राहिले… परब्रम्ह जिथे आवश्यकता असते तिथे संचार करत असते. कुणीही त्यांना एका ठिकाणी अडकवून ठेवू शकत नाही. वऱ्हाड प्रांतात अडगाव नावाचे गाव आहे तिथे गजानन महाराज जाण्यासाठी निघाले . तो महिना होता वैशाख. वैशाख महिना म्हणजे उन्हाळ्याचे दिवस होते. उन्हाचे प्रमाण इतके होते कि सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष होते. वाटेत अकोली नावाचे गाव होते. तिथे महाराज आले. महाराजांना खूप तहान लागली होती. महाराज ज्या रस्त्याने जात होते तिथे भास्कर नावाच्या शेतकरी आपल्या शेतात काम करीत होता. भास्कर ने स्वतःला पाणी पिण्यासाठी एक घागर पाणी आणले होते. श्री गजानन महाराज भास्कर च्या जवळ आले व पिण्यासाठी पाणी मागितले. पाणी पाजण्याचें खूप मोठे पुण्य आहे. पाण्याशिवाय प्राणाचे रक्षण होणे अशक्य आहे. मोठमोठे धनिक लोक पाणपोई द्वारे लोकांची तृष्णा भागवतात व पुण्य कमवतात. महाराजांच्या हि वाणी ऐकून भास्कर श्री महाराजाना म्हणाले आपण तर दिंगबर आपणस पाणी पाजून काय पुण्य मिळणार ? उलट जर अनाथ , पंगू , दुर्बल यांना पाणी पाजले तर पुण्य मिळेल हे शास्त्र वचन आहे. आपणास पाणी देऊन काय पुण्य मिळणार. मी आपणस पाणी देणार नाही. भास्कर हे बोलणे ऐकून महाराजांनी स्मित हास्य केले व तिथून पुढे निघाले. थोडे पुढे गेल्या नंतर तिथे एक विहीर होती. महाराजांना तिकडे जाताना पाहून भास्कर म्हणाला अहो ती विहीर कोरडी आहे. आणि हसू लागला. महाराज त्याला म्हणाले अरे तू म्हणतोस ते बरोबर आहे पण एक प्रयत्न करतो समाज हितासाठी पाहूया पाणी मिळते का ? महाराज विहिरी जवळ आले. विहीर पूर्णतः कोरडी होती. महाराज तिथेच असणाऱ्या एक वृक्षा काही ध्यान लावून बसले आणि त्यांनी प्रार्थना सुरु केली – हे देवा । हे वामना वासुदेवा । प्रद्युम्न राघवा । हे विठ्ठला नरहरी । हे आकोली पाण्यावाचून त्रस्त झाली । ओलही ना राहिली । कोठेंच देवा विहिरींतून । मानवी यत्न अवघे हरिलें । म्हणून तुजला प्रार्थिले । पाव आतां जगन्माऊली । पाणी दे या विहिरीला । महाराजांच्या प्रार्थनेचे रूपांतर कृपेत झाले. विहिरीला पाण्याचा पाझर फुटला आणि काही क्षणात विहीर पाण्याने तुडुंब भरली. महाराज त्या विहिरीचे पाणी पिले. हे सर्व पाहून भास्कर थक्क झाला आणि त्याला कळून चुकले महाराज नक्कीच कुणीतरी महान योगी आहेत. तो धावतच महाराजांच्या जवळ आला आणि महाराजांना क्षमा प्रार्थना करू लागला. हे नरदेह धारी परमेश्वरा । हे दयेच्या सागरा ।लेकरासी कृपा कर । अर्भक मी तुमचे । मी आपणस ओळखले नाही आणि आपणस अपशब्द बोललो मला माफ करा. महाराज तर कृपेचे सागर आहेत ते कधी आपल्या बालकांवर रागावतील का. उलट महाराज त्याला म्हणाले अरे तुला त्रास होत होता म्हणूनच विहिरी ला आणि आणले आहे. विहिरीला पाणी लागल्याची वार्ता संपूर्ण गावात पसरली अनेक गावकरी मंडळी तिथे आली. सर्वांनी एका स्वरात महाराजांचा जयजयकार केला बोला श्री गजानन महाराज कि जय!
बोध – खरंतर आजच्या लीलाच पूर्णतः बोध आहे. त्यावर वेगळा बोध लिहिणे आवश्यक नाही असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. तरी देखील महाराजांना प्रार्थना करून आपण इथे बोध मांडण्याचा प्रयन्त करूया. आजची संपूर्ण लीला आपणस प्रार्थनेचे महत्व समजून सांगत आहे. जिथे कुठे आपला भक्त अडचणीत असेल तिथे परब्रह्म आपली मदत करण्यासाठी येत असते. या लीलेत श्री भास्कर हे देखील कोणत्या तरी देवाची भक्ती , सेवा करत असतील. त्यामुळेच परब्रम्ह श्री गजानन महाराज लीलेचे निमित्त करून त्यांच्या साठी धावून आले. कारण महाराजच श्री राम , श्री कृष्ण , विठ्ठल आहेत. आपण ज्या कोणत्या देवाची भक्ती करतो त्यांची नावे विविध आहेत पण परब्रम्ह मात्र एकच आहे. महाराजांनी भास्कर यांना पाणी मागितले पण भास्कर ने आपल्या अर्धवट माहितीच्या आधारे महाराजांनाच आपले विचार सांगितले. महाराज त्यांना काहीच बोलले नाहीत कारण महाराजांची प्रत्येक लीला म्हणजे कृतीतून अनुभूती. इथे महाराजां नी स्वतः प्रार्थना केली. इथे महाराज आपणस प्रार्थनेची शक्ती समजवून सांगत आहेत. महाराजांनी प्रार्थना करून विहिरीस पाणी आणले. थोडक्यात महाराज आपणस सकारात्मक प्रार्थना करण्याची शिकवण देत आहेत. महाराज भास्करला म्हणत आहेत कि तुझ्या साठीच पाणी आणले आहे म्हणजेच भास्कर ने सुद्धा देवाला अनेकदा प्रार्थना केली असेल कि भगवंता पाण्याचे दुर्भिक्ष दूर कर आणि त्यांच्या प्रार्थनेचे फलस्वरूप महाराजांनी १४ वर्षांपासून कोरड्या असणाऱ्या विहिरीस पाणी निर्माण केले. इथे महाराज आपणस पाण्याचे महत्व देखील समजून सांगत आहे. पाणी म्हणजे जीवन. आज जे पाणी आहे ते जपून वापरा तसेच पाण्याचे स्तोत्र वाढवण्याची प्रेरणा महाराज आपणस देत आहेत.
चला आपण सर्व मिळून श्री गजानन महाराजांना प्रार्थना करूया – हे समर्था.. आजची लीला म्हणजे प्रार्थना कशी करावी याची शिकवण आहे आमच्यासाठी.. ज्या प्रमाणे तू श्री भास्करराव यांच्याकडून प्रार्थना करवून घेतलीस व प्रार्थनेस निमित्त करून त्यांच्यावर कृपा केलीस अशीच कृपा आमच्यावर कर.. आमच्याकडून सकारात्मक प्रार्थना करवून घे.. तसेच आमच्याकडून पाण्याचे स्तोत्र वाढावेत ह्या साठी आम्हाला निमित्त कर.. आमच्याकडून हि प्रार्थना करवून घेतलीस त्या बद्दल खूप खूप धन्यवाद !!