आत्महत्या – आपण अनेकदा ऐकतो किंवा वाचतो कि अमुक अमुक व्यक्तींनी आत्महत्या केली.. आपण ऐकतो हळहळ व्यक्त करतो.. जवळची व्यक्ती असेल तर कदाचित आपल्या डोळ्यातही अश्रू येतात..काही दिवसा नंतर आपण सर्व जण विसरून जातो.. आपण अनेकदा हेही ऐकले आहे कि आत्महत्या करणे पाप आहे वगैरे… खरंतर हे पाप आहे कि पुण्य आहे हा विषय फारच गौण आहे.. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक व्यक्तीचे जीवन अनमोल असे आहे.. मग ती व्यक्ती तरुण असो म्हातारी असो…ज्या व्यक्तींनी आत्महत्या केली आहे त्या व्यक्तीला तर आपण परत आणू शकत नाही.. पण आज समाजात अनेक व्यक्ती आहेत कि त्यांच्या मनात हा विचार येऊन जातो कि नको हे जीवन.. काही व्यक्ती तर आत्महत्येचा विचार करतात.. काही प्रयत्न करतात.. काही त्यात वाचतात तर काही मरतात.. खरंच ज्या व्यक्तीच्या मनात हे विचार येतात त्यांच्याशी हा संवाद आहे.. खरंच तुमचे जीवन इतके स्वस्त आहे का हो ? नऊ महिने आई तुम्हाला पोटात सांभाळलं.. स्वतः त्रास सहन केला फक्त तुमचा जन्म व्हावा यासाठी.. जन्म झाल्यानंतर आई बापाने तुमची तळ हाताच्या फोडा प्रमाणे तुमची काळजी घेतली.. रात्र रात्र जागून काढली पण तुम्हाला स्वस्थ ठेवले.. स्वतः एक वेळ जेवण केले नाही पण तुम्हाला २ वेळेस पोटभर जेवू घातले.. स्वतः शिकले नाही पण तुम्हाला मात्र चांगले शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी प्रयत्न केले…तुम्हाला चांगले शिकवले.. तुम्ही चांगल्या नोकरी ला लागलात.. तुमचे लग्न करून दिले.. किंवा तुम्ही तुमच्या मना प्रमाणे लग्न केले.. आता तुमची जबाबदारी वाढली.. जीवनात असे काही प्रसंग आले कि तुमच्या मनात प्रश्न येऊ लागले कि आता मरून जावे किंवा आत्महत्या करावी.. आत्महत्या करण्याची कारणे काय तर यावर चिंतन केले तर खालील कारणे सापडतात.
१) आई वडिलांनी अमुक एखादी गोष्ट दिली नाही म्हणून आत्महत्या – अरे मुला तुला समजत आहे का तू काय करत आहेस.. अरे जी गोष्ट मागत आहेस तिची खरंच तुला गरज आहे का ? अरे जरा विचार कर आई वडील कष्ट करतात त्यांना तुमची काळजी आहे.. एखादी गोष्ट मिळत नाही म्हणून तू जीव देत आहेस.. तुझ्या सारखा मूर्ख तूच आहेस असा वेडे पणा करू नकोस.. इथे पालकांनी देखील आपल्या मुलांशी संवाद साधायला हवा.
२) परीक्षेत कमी मार्क पडले वा नापास होणार म्हणून आत्महत्या – अरे जेव्हा अभ्यास करण्याची वेळ होती तेव्हा झोपा काढल्यास आणि आता परिस्थती पासून पळत आहेस अरे आत्म हत्या करू नकोस अपयश आले म्हणून खचून जाऊ नकोस.. पुन्हा प्रयत्न कर.. यश नक्कीच मिळेल.. इथेही पालकांनी मुलांशी संवाद साधावा. ३)प्रेमात अपयश – एखादी मुलगा किंवा मुलगी एकमेकांसाठी आत्महत्या करतात – खरंच अश्या मुलांची किंव येते कारण प्रेम म्हणजे काय हेच माहित नाही आणि म्हणे हंम एक दुजे के सिवाय जी नही सकते.. अरे खरं प्रेम असे नसते रे.. प्रेम म्हणजे त्याग.. इथं त्यागा पेक्षा मरण बरं असे तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या सारखे दरिद्री तुम्हीच आहात
४) कौटुंबिक वाद – यातून देखील अनेकजण आत्महत्या करतात.. खरंतर अनेक वाद आपल्यातील अहंकारापोटी होत असतात.. जर आपण आपल्यातील मी पणा सोडला तर नक्कीच वाद कमी होतील.. तरी देखील वाद होत असतील तर त्यावर चिंतन मनन करा पण जीव देऊ नका
५) कर्ज बाजरी पणा- आपल्या कडे सर्वात जास्त लोक कर्ज बाजरी पणा मूळे आत्महत्या करतात.. खरंच हा विचार जर तुमच्या मनात येत असेल तर पुढील प्रश्न स्वतःला विचारा माझ्यावर किती कर्ज आहे.. हे कर्ज नाही फेडले तर काय होऊ शकते.. माझी कर्ज फेडण्याची इच्छा आहे का? जर असेल तर काय केले तर हे कर्ज मी फेडू शकतो? माझी हि कर्जाची अडचण मी कुणाशी संवाद साधून बोलू शकतो का? मी जर आत्महत्या केली तर हे कर्ज माफ होईल का? कर्ज जरी माफ झाले तरी माझी बायको , मुले , आई ,वडील यांनी त्यांचा पुढचा उदर निर्वाह कसा करायचा.. माझे जीवनाचे मूल्य इतके कमी आहे का? हे प्रश्न किमान १० वेळेस विचारा नक्कीच तुमचे उत्तर तुम्हाला मिळेल.
नक्कीच मनुष्य जन्म एकदाच मिळतो.. मेल्यावर काय होते हे अजून तरी कुणाला माहित नाही.. माणूस दिसत नाही हे सर्वांना माहित आहे पण नक्की काय होते माहित नाही.. ईश्वराने दिलेले जीवन पूर्णपणे जगूया.. आपण मेल्याने काही फरक पडत नाही पण फरक पडतो आपल्या कुटुंबाला.. जर आपण जीव देऊ शकतो याचाच अर्थ आपण कष्ट करून इतिहास हि घडवू शकतो…आता इतिहास घडवायचा कि इतिहास जमा व्हायचे हे तुम्हीच ठरवा.. समस्या तर असणारच आहे.. प्रत्येक व्यक्तीला समस्या आहे.. समस्या आहे त्या मुळेच सुखाला किंमत आहे.. आणि जगातील सर्व भौतिक वस्तूपेक्षा मौल्यवान जर काही असेल तर आहे आपला जीव..आपली समस्या घेऊन रडत बसू नका.. समस्या व्यक्त करा.. वाईट विचार आले तर व्यक्त व्हा.. पण अमूल्य असा जीव.. आत्महत्या करून संपवू नका.. हा जन्म पुन्हा नाही नक्कीच आपण हुशार आहात यावर चिंतन मनंन कराल .
चला तर मग समर्थांना प्रार्थना करूया हे समर्था आज तू आम्हाला जीवन म्हणजे काय हे सांगितलेस त्याबद्दल धन्यवाद.. अनेकदा माझे नकारात्मक मन.. लढण्यापेक्षा पळण्याकडे धाव घेते.. यातून मी हे अमूल्य जीवन नष्ट करण्याचा विचार मनात येऊन जातो त्याबद्दल मला माफ कर.. असे नकारात्मक विचार नष्ट कर.. आम्हाला संकटाशी लढण्याची बळ दे.. सामर्थ्य दे.. तुला अपेक्षित असणारी जीवनाची अभिव्यक्ती आमच्यकडून करून घे.. हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद.. !