श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 18 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

लीला क्रमांक १७ मध्ये आपण पहिले कि महाराज पिपंळगावात आले. समाधी अवस्थे मधून महाराज बाहेर यावेत व आपल्याशी बोलावेत यासाठी गावकर्यांनी कसा प्रयत्न केला आणि त्यांच्या श्रद्धेचे फलस्वरूप महाराज समाधी अवस्थेतून बाहेर आले तो दिवस होता सोमवारचा. पुढे दुसऱ्या दिवशी मंगळवारी शेगांव चा बाजाराचा दिवस होता. त्या बाजारात अनेक पिंपळगावातील मंडळी गेली होती. त्याच बाजारात श्री बंकटलाल देखील आले होते. त्या दिवशी बाजारात अनेक लोकांच्या बोलण्यात येत होते कि आमच्या पिंपळगावात एक अवलिया आले आहेत. हा हा म्हणता हि बातमी संपूर्ण बाजारात पसरली. बंकटलाल यांच्या कानी हि गोष्ट पडताच त्यांना मनातून खात्री वाटली कि नक्कीच ते आपले श्री गजानन महाराजच असणार. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या पत्नी सहित पिंपळगाव गाठले. पाहतो तर काय साक्षात परब्रह्म श्री गजानन महाराजच होते. मग काय त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू येऊ लागले. त्यांनी महाराजांना वंदन केले. महाराज आपण आता येतो म्हणून गेलात.. आज पंधरा दिवस झाले महाराज… आमचे काही चुकले काय .. महाराज तुमच्या विना शेगांव भणभणीत दिसत आहे.. सर्व सेवेकरी आपली वाट पहात आहेत.. बैल गाडी आणली आहे.. आपणस विनंती आहे.. आपण शेगांवास चलावे… माय लेकांची ताटातूट होणे बरे नव्हें… अनेक भक्त आपली वाट पहात आहेत… आपणस विनंती आहे आपण शेगांवी चलावे… बंकटलाल यांची प्रार्थना महाराजांनी स्वीकार केली आणि ते बैलगाडीत बसले. पिंपळगावतील लोकांना अश्रू अनावर झाले. बंकटलाल यांनी सर्व गावकर्यांना म्हणाले आपणस विनंती आहे. महाराजांना भेटण्यास आपण शेगांवी येत जावे तरी आपण आम्हाला निरोप द्यावा. काही अंतर गेल्या नंतर श्री गजानन महाराज बंकटलाल यांना म्हणाले. हि सावकाराची रीत असते का ? दुसऱ्याचा माल बळजबरीने न्यावा मला तर तुझ्या घरी येण्यास भीती वाटते. महालक्ष्मी जी जगद्जननी आहे जिची सर्वत्र सत्ता तिला सुद्धा तू कोंडून ठेवले आहे. तिथें माझे काय ? म्हणून मी निघून गेलो होतो. महाराजांची हि वाणी ऐकून बंकटलाल खूपच विनय पूर्वक महाराजांना म्हणाले महाराज. महाराज माझ्या कुलुपाला ती जगन्माता भ्याली नाही तर तुमचा वास तिथे आहे म्हणून ती माझ्याकडे स्थिर ( चिरकाल ) आहे. ज्या ठिकाणी आई असते तिथेच बाळ असते. महाराज आपल्या चरण कमला पुढे माझ्या साठी काहीच मौल्यवान नाही. आता माझे असे काहीच नाही. जे काही आहे ते सर्व तुमचे आहे. माझी आपणस इतकीच विनंती आहे आपण शेगांवात रहावे. अशा रीतीने श्री गजानन महाराज पुन्हा शेगांवात आले. सर्व गावकरी खूप आनंदित झाले आणि सर्वांनी एक घोषात महाराजांचा जयजय कार केला . बोला श्री गजानन महाराज कि जय !

बोध – खरंतर आजची लीला म्हणजे आपणस भक्ती कशी असावी हे आपणस समजण्यासाठी केलेली हि लीला आहे हाच बोध आपणास मिळत आहे. पहा ना बाजारात केवळ चर्चा झाली कि कुणीतरी अवलिया पिंपळगावात आले आहेत यावरून बंकटलाल यांच्या मनात लगेचच सकारात्मक विचार आला कि नक्कीच ते श्री गजानन महाराजच असणार. किती तो विश्वास आणि श्रद्धा आणि त्याचे फलस्वरूप खरोखर ते श्री महाराजच होते. आपणासही आपली भक्ती वाढवायची आहे. श्री बंकटलाल यांनी महाराजांना विनंती केली महाराज आपण शेगांवी चलावे.. यावरून आपल्या लक्षात येते कि श्री बंकटलाल यांची महाराजांच्या चरणी जी काही श्रद्धा… भक्ती होती किती उच्च असेल. कारण परब्रम्हाला आपल्या सोबत नेणें म्हणजे तितकेच त्यांचे सुद्धा आपल्यावर प्रेम असणे आवश्यक आहे. यावरून आपणस आपले व महाराजांचे नाते कसे निर्माण झाले पाहिजे याची समज प्राप्त होते. काही अंतर गेल्या नंतर महाराज श्री बंकटलाल यांना म्हणतात मला तुझी भीती वाटते कारण तू लक्ष्मी मातेस बंदिस्त केले आहे… यावर श्री बंकटलाल म्हणतात महाराज जे कि आहे ते तुमचे आहे. तुम्ही आहात म्हणून जगद्जननी माझ्याकडे वास करत आहे. मला आपले चरण कमल सोडून काहीच नको. इथे खूप खोल असा संदेश महाराज देत आहेत. लक्ष्मी हि कमवलीच पाहिजे पण लक्ष्मी माता प्रसन्न झाल्यानंतर आपले मन लगेचच त्याच गोष्टीला सर्वस्व मानते आणि इथेच गडबड होते. असे होऊ नये यासाठी बंकटलाल यांचे वाक्य आपणस नेहमी लक्षात ठेवायचे आहे. जी काही जगद्जननी लक्ष्मी मातेची कृपा आहे ती सर्व आपल्या महाराजांची कृपा आहे. कुठेच मला अहं भाव ठेवण्याची चूक करायची नाही.पहा हा भाव आपल्या आयुष्यात भरभरून लक्ष्मी मातेचा वास असेल आणि आपल्या ह्रदयातून फक्त धन्यवाद चे भाव येतील… धन्यवाद महाराज कोटी कोटी धन्यवाद . चला आपण श्री गजानन महाराजांना प्रार्थना करूया

हे समर्था आजची तुझी लीला म्हणजे भक्तीच्या उच्च अवस्था प्राप्त करून घेण्याचा आमच्या साठी प्रसादच आहे.. हा प्रसाद आम्हाला दिलास त्या बद्दल खूप खूप धन्यवाद… जशी श्री बंकटलाल यांना भक्ती प्राप्त झाली.. अशी भक्ती आमच्या ह्रदयात जागृत कर.. कारण हे सर्व तुझ्या कृपेशिवाय शकय नाही… तुझ्याच कृपेने आमच्या जीवनातं.. जगद्जननी श्री लक्ष्मी मातेचा वास आहे.. हि समज दिलीस त्या बद्दल धन्यवाद… हि जी समज आज प्राप्त झाली आहे ती आमच्या अंतर्मनात रुजव कारण आमचे मन कायम स्व चा नारा लावते आणि इथेच मी अडकतो.. कृपा कर मला या पासून वाचवं… आणि प्राप्त लक्ष्मीचा वापर योग्य पध्द्तीने करण्याची समज मला दे.. कारण तू भरपूर देतोस.. धन्यवाद समर्था हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद !

श्री गजानन चरित्र दर्शन 17 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

श्री गजानन महाराज शेगांव मध्ये होते..महाराजांच्या लीला ची प्रचित अनेक भक्तांना येत होती..त्यामुळे दिवसेंदिवस.. भक्तांची गर्दी वाढतच होती..अचानक एक दिवस महाराजांच्या काय मनात आले माहित नाही… महाराज अचानक शेगांव सोडून… शेगांव जवळ असणाऱ्या पिंपळगाव गावात निघून गेले… महाराज कुठे गेले हे कुणासच ठाऊक नव्हते… त्या पिंपळगाव गावात अरण्यात एक हेमाडपंती शंकराचे मंदिर होते… महाराज मंदिरात जाऊन बसले… पद्मासनात महाराज ध्यानस्थ बसले… त्या अरण्यात अनेक गुराखी मुले आपले गुरे घेऊन येत असत… गुरे चरत असताना काही मुले भगवान शंकराच्या मंदिरात दर्शन करण्यासाठी येतात… तेव्हा त्यांना महाराजांचे दर्शन होते… महाराजांचे स्वरूप पाहून ते मुले जरा गोंधळून गेली.. कारण महाराज ध्यानस्थ बसले होते… त्या मुलांनी महाराजांशी बोलण्याचा प्रयत्न केला पण महाराज काहीच बोलले नाही… काहींना वाटले हे साधू जेवण न मिळाल्या मुळे कदाचित बोलत नसावेत… तेव्हा त्या मुलांनी आपल्या जवळील जी शिदोरी होती… ठेचा.. भाकरी… कांदा महाराजांना दिला परंतु महाराज काहीच बोलले नाहीत.. ते ध्यानावस्थेतच होते…  मुलांना काहीच समजत नव्हते… ते एकमेकांशी बोलत होते..कुणी म्हणे हे मरण पावले आहेत असेही नाही कारण… मृत माणसाचे अंग गार असते… यांचे अंग गार नाही… कुणी म्हणे भूत… पण भूत असू शकत नाही… भूत मंदिरात बसणार नाही… कुणी म्हणाले हे देव असावेत… आपण यांचे पूजन करू… त्या सर्वांनी महाराजांची पूजा केली.. पण महाराज काही ध्यानातून बाहेर आले नाही… आता दिवस मावळण्याची वेळ झाली होती… सर्व मुले एकमेकांना म्हणाली आता आपण घरी जाऊ या… आपले घरचे वाट पहात असतील… त्या मुलांनी ठेचा भाकरी तशीच ठेवली व सर्व जण आपापल्या घरी निघून गेले … सर्वांनी घरी गेल्यावर हि घटना आपल्या घरी सांगितली… संपूर्ण गावात हि बातमी पसरली… दुसऱ्या दिवशी सर्व गावाचं त्या मंदिरात आले… पाहतो तर काय… महाराज त्याच अवस्थेत होते… महाराजांनी भाकरी सुद्धा खाल्ली नव्हती… सर्वांना आश्चर्य वाटले… काही जण म्हणे हे शिवजी आहेत… समाधी अवस्थेत आहेत.. त्यांना त्रास होईल असे वर्तन करू नका… गावातील सर्व लोकांनी एक पालखी सजवली आणि त्यात महाराजांना बसवले… महाराजांची पूजा केली… वाद्य संगीतात महाराजांची पालखी सोहळा करण्यात आला… अनेक लोक भजन म्हणत होती… जय जय योगीराज मूर्ती… महाराजांची पालखी गावातील मारुती मंदिरात आणण्यात आली… पाटावर महाराजांना बसवण्यात आले.. महाराज समाधी अवस्थेतच होते… तोही दिवस तसाच गेला… आता लोकांना काय करावे समजत नव्हते… कुणी स्तवन करत होते… कुणी प्रार्थना करत होते… तर काही जणांनी उपवास पकडला… महाराजांनी समाधी अवस्थेतून बाहेर येऊन आपल्याशी बोलावे या साठी…आणि काय आश्चर्य महाराज समाधी अवस्थेतून बाहेर आले… उपस्थित सर्व मंडळी आनंदित झाली… सर्वानी महाराजांना नैवैद्य ग्रहण करण्याची विनंती केली… महाराजांनी नैवद्य ग्रहण केला… सर्व जण खूप आनंदित झाले… तो दिवस होता सोमवार चा … सर्वांनी एक घोषात महाराजांचा जयजयकार केला… जय जय योगीराज मूर्ती .

बोध – वरील लीला तर आपल्या मनाचे दर्शन होण्यासाठी एक आरसाच आहे.. महाराज शेगांव सोडून अचानकपणे पिंपळगाव गावात आले.. म्हणजेच परब्रह्म हे कधीच एका ठिकाणी नसतात… ते सर्वत्र असतात.. त्यांना आपण कोणत्याही क्षेत्रा पुरते मर्यादित समजू नये… महाराज अरण्यातील शिव मंदिरात ध्यानस्थ बसले.. महाराज इथे आपणस ध्यानाचे महत्व सांगत आहेत.. आपणस जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण ध्यानात जावे… म्हणजेच आपल्या मूळ अवस्थेत जाण्याचा प्रयत्न करावा हा खूप खोल असा संदेश महाराज आपणस देत आहेत… इथे गुराखी मुले गुरांना चरण्यासाठी घेऊन आले होते… जेणेकरून त्यांना मनसोक्त चरण्याचा आनंद घेता येईल… इथे महाराज आपल्याला आपल्या मनाचे दर्शन घडवत आहेत… आपले मन देखील त्या गुरां प्रमाणे इकडे तिकडे चोहीकडे धावत असते… ते कधीच एका ठिकाणी स्थिर रहात नाही… महाराज यातून आपणस सांगत आहेत… ज्या प्रमाणे गुरे चरण्यासाठी गुराखी विशिष्ठ ठिकाणी घेऊन जातात जेणेकरून इतर कुणाचे नुकसान होऊ नये… इथे महाराज या गोष्टीला निमित्त करून सांगत आहेत ज्या प्रमाणे गुराखी गुरे एका ठिकाणी चरण्यासाठी आणतो… त्या प्रमाणे आपणस आपले मन चांगल्या गोष्टी साठी स्थिर करायचे आहे… जेणेकरून ते चुकीच्या ठिकाणी धाव घेणार नाही… महाराजांना पाहिल्या नंतर त्या मुलांच्या मनात अनेक प्रश्न आले… त्यांनी सर्वात महत्वाची गोष्ट केली कि महाराजांना खाण्यासाठी ठेचा… भाकरी आणून दिली… यातून आपणस बोध होतो कि आपण आपल्या भोजनातील काही हिस्सा गरजू व्यक्तीला देणे आवश्यक आहे… पहा त्या गुराखी मुलांकडे किती भाकरी असेल त्यांच्या पुरतीची असेल… पण तरी देखील त्यांनी आपल्यातील भाकरी त्यांना दिली… यातून आपणस इतरांना देण्याचा गुण विकसित करण्यास सांगत आहेत… गावांतील लोकांनी महाराजांना शिव स्वरूप मानले…आणि श्रद्धा युक्त त्यांनी महाराजांचे पूजन केली… अनके भजने … प्रार्थना केल्या पण महाराज समाधी अवस्थेतून बाहेर आले नाहीत… हे सर्व पाहून त्यानी उपवासाचे व्रत घेतले… या व्रतातून आपणस विश्वास … श्रद्धा व भक्ती कशी असावी याची आपणास महाराज ओळख करून देत आहेत… उपवास म्हणजे केवळ अन्न पाणी सोडणे नाही तर…आपल्यातील नकारात्मक विचारांचा उपवास करण्याची महाराज आपणस शिकवण देत आहेत.. थोडक्यात आजची लीला म्हणजे बोधांचा खजाना आहे. चला आपण श्री गजानन महाराजांना प्रार्थना करूया… हे समर्था आजच्या लीलेतून तू आम्हाला आमच्या मनाचे दर्शन घडवून दिलेस त्याबद्दल धन्यवाद…आपण आजच्या लीलेस माध्यम करून ध्यानाचे जे महत्व समजून दिलेस त्याबद्दल धन्यवाद..आम्हाला तुझ्या ध्यानात मग्न कर… आमच्या मनाला ध्यानाची सवय लागावी यासाठी मला मदत कर…आमच्यात इतरांना देण्याचा गुण विकसित कर.. आम्हाला आमच्यातील नकारात्मक विचारांवर उपवास करण्याची सवय आमच्यात दृढ कर… समर्था हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद… कोटी कोटी धन्यवाद !! 

श्री गजानन चरित्र दर्शन 16 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

ऐके दिवशी सर्व सेवेकरी मंडळी महाराजांच्या चरणी सेवा रुजू करत होते.. अचानक महाराजांनी सर्वांना बोलवले व म्हणाले… वसंत पंचमी च्या दिवशी घनपाठी ब्राम्हण बोलवा.. मंत्र जागर करूया.. तसेच सर्वांनी एक एक रुपया दक्षिणा देण्यासाठी काढावा… महाराजांची हि वाणी ऐकून सर्व सेवेकरी म्हणाले … महाराज आपण सांगत आहात ती सर्व सेवा आम्ही करू पण.. आपल्या गावात घनपाठी ब्राम्हण नाहीत… महाराज म्हणाले अरे तुम्ही तयारी करा… परमेश्वर स्वतः साह्य करतील .. नक्कीच ब्राम्हण मिळतील… सेवेकरी मंडळींनी सर्व तयारी केली… वर्गणी च्या माध्यमातून साधारण १०० रुपये जमा झाले.. वसंत पंचमी च्या पूजेची तयारी झाली… आता सर्व जण पुरोहितांची वाट पाहू लागले… इतक्यात अचानक काही घनपाठी ब्राम्हण महाराजांकडे आले.. त्यांनी महाराजांना काय सेवा करावी विचारले… तर महाराजांनी आपला मनोदय सांगितला… महाराजांची वाणी ऐकून ते पुरोहित खूप आनंदित झाले आणि त्यांनी वसंत पंचमी ची पूजा वेद घोषात सुरु केली… अश्या रीतीने महाराजांच्या वाणी नुसार पूजा संपन्न झाली… अजूनही बंकटलाल यांचे पूर्वज हि सेवा रुजू करतात… सर्वांनी एक घोषात महाराजांचा जयघोष केला !!

बोध – वरील लीला आपणस खूप छोटी वाटते पण बोधाचा खजाना आहे… गुरु आज्ञाचे पालन कसे करावे याचा आपणस बोध होत आहे.. पहा वरील लीलेत श्री महाराजांनी आपला मनोदय सर्व सेवेकरी मंडळींना सांगितला… सेवेकरी मंडळी म्हणाले महाराज आपण सांगाल ती सेवा करण्यास आम्ही तयार आहोत… या ठिकाणी आपणस आपला सेवा भाव कसा असावा याचे दर्शन होते… महाराजांच्या वाणी नुसार सर्व सेवेकरी सेवा करण्यास तयार झाले… आणि साधारण १०० रुपये जमा झाले… त्या काळात १०० रुपये म्हणजे खूप मोठी रक्कम होय… सर्व सेवेकऱ्यांच्या मनात महाराजांच्या प्रति अतूट श्रद्धा व विश्वास भाव होता… महाराजांनी सांगितले आहे म्हणजे… घनपाठी ब्राम्हण येणारच… त्यासाठी सर्व लोकांनी देखील प्रार्थना केल्या असतील… त्या प्रार्थनेतील भाव देखील शुद्ध होता… त्या मुळेच अचानकपणे वेद पठण करण्यासाठी ब्राम्हण तेथे आले… या ठिकाणी महाराज देखील संदेश देत आहेत कि… पुरोहित म्हणजे जो दुसऱ्याचे हित इच्छितो तो… पुरोहित ( ब्राम्हण) आपणस देखील वरील लीलेचा बोध घेऊन गुरु आज्ञेचे पालन करायचे आहे… आणि महाराजांना अपेक्षित जीवनाची अभिव्यक्ती करायची आहे …!!

चला आपण श्री गजानन महाराजांना प्रार्थना करूया … हे समर्था आजची लीला म्हणजे आमच्या साठी गुरु आज्ञेचे पालन कसे करावे याची शिकवण दिलीत… त्या बद्दल धन्यवाद… अनेकदा आमचे मन आमच्या मना प्रमाणे वागण्याचा आग्रह करते… त्यात अनेकदा आमचे हित नसते… आम्हाला तुझ्या आज्ञेचे पालन करण्याची बुद्धी दे… तसेच स्व हिता पेक्षा… सर्वांचे हित होईल असे कर्म करण्याची बुद्धी आम्हाला दे… हे आई हि प्रार्थना करून घेल्याबद्दल धन्यवाद… कोटी कोटी धन्यवाद

श्री गजानन चरित्र दर्शन 15 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

शेगांवच्या दक्षिण दिशेला चिंचोली नावाचे गाव आहे. त्या गावात माधव नावाचे एक ब्राम्हण राहत होते. त्यांचे वय साधारण ६० पेक्षा जास्त होते. त्यांनी आपलें संपूर्ण आयुष्य हे संसार म्हणजे सर्वस्व या साठी खर्ची केले होते. आपल्या भविष्यात काय लिहून ठेवले आहे हे कुणासच माहित नसते. हीच स्थिती माधव यांची झाली .अचानकपणे त्याच्या आयुष्यात दुःखद घटना घडू लागल्या. अचानकपणे त्यांच्या पत्नीचे व मुलाचे निधन झाले . अचानकपणे घडलेल्या या गोष्टीमुळे त्यांच्या समोर दुःखाचा डोंगर उभा राहिला. ते पूर्णपणे एकाकी झाले. त्यांना एकदमच विरक्ती आली. आता ते देवाचा धावा करू लागले. त्यांच्या ह्रद्यातून प्रार्थना निघू लागल्या. हे परमेश्वरा हि माझी काय अवस्था झाली आहे. मी तर आयुष्यभर संसारच केला.कधी तुझे नाव घेतले नाही. आज तो संसार पूर्णपणे विस्कटला आहे. आता मला कुणीच नाही. आता माझा सांभाळ कोण करणार. हे परमेश्वरा तूच मला तारू शकतोस. अश्या प्रार्थना करता करता. कुणाच्या तरी सांगण्यावरून ते शेगांवी येतात. श्री गजानन महाराजांच्या सानिध्यात आल्या नंतर त्यांनी उपोषण सुरु केले. अन्न पाण्याचा त्याग करून त्यांनी हरी नाम सेवा सुरु केली. श्री गजानन महाराजांनी त्यांना सांगितले बाळा असे करू नकोस.अरे आज जी नाम सेवा करत आहेस ती आयुष्यभर का नाही केली ? ज्या पत्नी व मुलांसाठी तू आयुष्यभर संसार केलास ते तर तुला सोडून गेले. आता तुला परमार्थ आठवत आहे. आपण जे कर्म करतो त्याचे फळ आपणस भोगावेच लागते. महाराज त्याला म्हणाले हट्ट करू नकोस भोजन करून घे. तिथे उपस्थित लोक होते त्यांनी देखील भोजन करण्यासाठी विनंती केली परंतु त्याने कुणाचेच ऐकले नाही. अन्न त्याग करून तो तसाच समर्थांच्या सानिध्यात हरी नाम घेत बसून राहिला. आता रात्रीची वेळ झाली सर्वजण झोपले होते. माधव हि तिथेच झोपला होता. महाराजांनी यम स्वरूपात माधव यांस स्वप्नात दृष्टांत दिला. यमाचे ते महा भयंकर रूप पाहून माधव घाबरले. त्यांना धडकी भरली. छाती धडधडु लागली. त्याच्या तोंडातून शब्दच फुटेना. हे सर्व पाहून समर्थांनी सौम्य रूप धारण केले व माधवास म्हणाले अरे स्वतःला धीट म्हणतोस आणि काळाला घाबरतोस. असाच एक दिवस काळ येईल आणि तुला घेऊन जाईल. तुला त्याचे दर्शन घडवले आहे.महाराजांची हि वाणी ऐकताच.. माधव विनंती पूर्वक महाराजांना म्हणाला. यमलोक नको. तेवढी यात्रा टाळा. वैकुंठ प्राप्ती व्हावी हीच प्रार्थना. माधवाची प्रार्थना ऐकून श्री महाराज हसू लागले व म्हणाले अरे मृत्यू समोर येताच हरी नाम घेत आहेस . जर अजून तुझी जगण्याची इच्छा असेल तर आयुष्य वाढेल. तेव्हा श्री माधव म्हणाले महाराज आता आयुष्य नको इतकीच इच्छा आहे कि उर्वरित आयुष्य आपल्या चरणकमलात जावे व शेवटचा श्वास आपली सेवा करता करता व्हावा. महाराजांनी श्री माधव यांची इच्छा पूर्ण केली व महाराज तथास्तु म्हणाले. अश्या रीतीने श्री माधव यांचे देहावसन श्री महाराजांच्या सानिध्यात झाले.
बोला श्री गजानन महाराज कि जय ! 

बोध – खरंतर वरील लीला हि आपल्या सर्वांच्या डोळयातील अंजन अशी आहे. बोध वर मनन करण्यापूर्वी श्री माधवराव यांना नमन करूया कारण त्यांना माध्यम करून समर्थ आपणस बोध देत आहेत. वरील लीलेत श्री माधवराव हे आयुष्यभर संसारात गर्क होते. संसार करत असताना त्यांना केवळ संसारात लक्ष होते. त्यांच्या मुखात कधीच हरी नाम आले नाही. संसार करता करता त्याच्या वयाची ६० वर्षे गेले. अचानकपणे त्यांच्या संसारात दुःख आले त्यांची पत्नी व मुलगा यांचे निधन झाले. आकस्मिकपणे झालेल्या घटने मुळे त्यांना एकदम संसारातून विरक्ती आली आणि ते हरी नामाकडे वळाले. खरंतर आयुष्य संसारात गेले होते. अचानकपणे हरी नाम घेणे सुद्धा त्यांना जड जात होते. पण काही तरी पुण्याई असावी त्यांना श्री गजानन महाराज भेटले. महाराज भेटले तरी त्याचा अट्टाहास सुरूच होता. कारण श्री महाराजांना ओळखण्याची दृष्टी नव्हती. आपले देखील असेच होते. आपण संसार करत असताना आपल्या मुखात हरी नाम येत नाही. तसेच आपले मन देखील सबब देते कि नाम घेण्यासाठी वेळ नाही. असे करत करत आपल्या संसाराचा गाडा सुरु असतो. काही समस्या आली कि आपण तेवढ्यापुर्ती हरी नाम सेवा करतो. समस्या सुटली कि परत संसारात गर्क होतो. खरंतर आपल्या जीवनात एखादी समस्या व संकट येते ते या साठी असते आपल्याला हरी नामावर स्थिर करण्यासाठी. संकट आपल्याला घडवत असते पण आपले मन नेहमी संकटापासून दूर पळण्याचा प्रयत्न करते. श्री माधवराव यांची पुण्याई होती म्हणून त्यांना वार्धक्यात देखील हरी नाम घेता आले. आणि आपली काहीतरी पुण्याई म्हणून आपणस श्री महाराजांच्या कृपेने त्या लीलेस माध्यम करून श्री महाराज आता पासून हरी नाम घेण्यास सांगत आहेत. श्री माधवराव यांना यम स्वरूपात दर्शन देऊन त्यांच्या मनातील सर्व प्रश्नाचे उत्तर श्री महाराजांनी दिले .या यम स्वरूप दर्शनातून महाराज आपणस सांगत आहेत . बाळांनो प्रत्येक क्षणी काळ जवळ येत आहे परंतु आपणस त्याचा विसर पडला आहे. काळ कधी येईल व घेऊन जाईल हे सांगता येणार नाही. काळ येण्याआधी आपणस हरी नामात दंग व्हायचे आहे. म्हणजेच आपल्या ह्रदयातील नामावर स्थिर व्हायचे आहे. या साठी सातत्य हा गुण आवश्यक आहे . श्री माधव राव यमलोक नको तर वैकुंठ हवा आहे असे म्हणत आहेत म्हणजे काय तर प्रत्येक श्वास हा हरी नामात जावा हि प्रार्थना ते करत आहेत म्हणजेच आपणस ते समज देत आहेत कि प्रत्येक श्वास हा हरी नाममय व्हावा !
चला तर मग आपण सर्व जण श्री गजानन महाराजांना प्रार्थना करूया – हे समर्था तुझी प्रत्येक लीला तर बोधच आहे.. परंतु आमचे मन तिला फक्त लीला वा गोष्ट म्हणून घेते.. आजच्या लीलेस माध्यम करून आम्हाला संसार व अध्यात्म यांची सांगड कशी घालावी याची शिकवण दिलीत त्या बद्दल धन्यवाद… आमचे मन संकट व दुःख आले तरच तुझे नाम घेते… आमच्या वर कृपा कर व आमच्या मनाला सदैव तुझ्या नामात दंग कर… आमचा प्रत्येक श्वास हा तुझ्या नामाचा दास असावा.. नामरूपी वैकुंठात आम्हाला स्थिर कर… कारण तुझे नामच सत्य आहे.. हि समज दिल्याबद्दल धन्यवाद… कोटी कोटी धन्यवाद !!

 

श्री गजानन चरित्र दर्शन 14 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

उन्हाळ्याचे दिवस होते… श्री गजानन महाराज अनेक भक्त मंडळी सोबत बसले होते…त्या भक्त मंडळी मध्ये श्री चंदूमुकीम नावाचा एक भक्त होता… तो भक्ती भावाने सेवा रुजू करत होता… आंब्याचे दिवस होते… त्यामुळे महाराजांसाठी श्री चंदूमुकीम आंबे आणले होते… महाराजांनी एक दोन आंब्याच्या फोडी खाल्या… अचानक श्री महाराज श्री चंदूमुकीम यांस म्हणाले… चंदू मला आंबे नकोत… तुझ्या घरी उतरंडीला दोन कान्होले ठेवले आहेत ते घेऊन ये… मला ते खायचे आहेत…श्री चंदूमुकीम म्हणाले महाराज कान्होले नाहीत घरी तयार…आपली अनुमती असेल तर मी ताजे कान्होले तयार करून आणतो… श्री महाराज चिडून म्हणाले… गुरूंशी खोटे बोलू नकोस… जा लवकर… उपस्थित लोकांनी चंदू ला सांगितले कि महाराज अंगात आहेत त्या प्रमाणे घरी जाऊन पहा… श्री श्री चंदूमुकीम घरी जाऊन आपल्या पत्नीस सर्व सांगतात… तेव्हा त्यांची पत्नी म्हणते… अहो एक महिन्या पेक्षा जास्त कालावधी झाला आहे.. आपल्या घरात कान्होले नाहीत… ती म्हणाली अहो आपल्या घरात सर्व सामान आहे… मी लगेचच ताजे कान्होले तयार करते… तेव्हा श्री चंदूमुकीम म्हणाले महाराज म्हणत आहेत त्या प्रमाणे तू उतरंडीला तपासून पहा… असे म्हण्टल्या नंतर एकदम तीला आठवेल आणि ती तिच्या पतींना म्हणाली..समर्थ जे म्हणत आहेत ते खरे आहे… अहो मी खापराच्या कळशीत २ कान्होले ठेवले होते… व ती कळशी उतरंडीला ठेवली आहे… परंतु ते कान्होले आत खराब झाले असतील… श्री चंदूमुकीम यांनी उतरंडी वरील ती खापराच्या कळशी काढली… ती कळशी काढून त्यातील कान्होले पाहले तर.. ते कान्होले ताजे तवाने होते.. ते खराब झाले नव्हते… ते कान्होले घेऊन ते लगेच महाराजांकडे जातात… सर्वांना महाराजांच्या वाणीचा अनुभव येतो … सर्वजण एका घोषात महाराजांचा जय जयजय कार करतात !!

बोध – वरील लीला म्हणजे महाराजांच्या अंतःसाक्षीत्वाची अनुभूती देणारी लीला आहे…उपरोक्त लीलेत उतरंडीस कान्होले ठेवले होते… उतरंडी म्हणजे अशी जागा कि सहसा आपले लक्ष जात नाही … खरंतर वरील लीला एक निमित्त आहे आपल्याला समज देण्यासाठी… जसे कान्होले होते घरातच पण त्याकडे कुणाचेही लक्ष नव्हते… त्याच प्रमाणे आपल्या मध्ये देखील काही नकारात्मक गुण असतात जे आपल्या मनाने झाकलेले असतात त्याचे आपणस कधी दर्शन होत नाही… महाराज आपल्या जीवनात दुःख संकट देऊन आपणस काम करण्याची संधी देत असतात.. पण जसे वरील लीलेत श्री महाराज श्री चंदूमुकीम यांस सांगत होते उतरंडीस कान्होले आहेत ते मला हवे आहेत… पण श्री चंदूमुकीम यांचे नकारात्मक मन त्यास विरोध करत होते… पण त्यांची भक्ती उच्चतम होती त्यामुळे त्यांना महाराजांच्या अंतःसाक्षित्वाची अनुभूती आली.. आपण हि श्री चंदूमुकीम यांच्या प्रमाणे विरोध करतो… आणि आपल्यातील नकारात्मक सवयी… विचार यावर काम करण्यास तयार होत नाही… आणि आपण आलेले संकट वा दुःख यांस केवळ नकारात्मक विचारांतून पाहतो … त्यामुळे आपल्यातील भक्ती ची पातळी खालावते… खरंतर आपल्या जीवनात जर संकट वा दुःख आले तर आपणस वरील लीलेतील उतरंडी ची आठवण करायची आहे… जी आपणस सांगत आहे… दुःख व संकट फारच कमी आहे… फक्त गरज आहे थोडेसे वरती डोकावून पाहण्याची… जर आपण आपले विचारात सकारात्मकता आणली तर… जसे श्री चंदूमुकीम यांना खापराच्या कळशीत कान्होले सापडले तसे… आपल्या जीवनात देखील यशरूपी कान्होले आपणस प्राप्त होतील… धन्यवाद महाराज … कोटी कोटी धन्यवाद !!
चला आपण त्यासाठी श्री गजानन महाराजांना प्रार्थना करूया – हे समर्था आजची तुझी लीला तर आमच्या साठी दृष्टिदान आहे… आम्ही तर नकारात्मक विचार करतो.. पण वरील लीलेतून तू आम्हास संकटाकडे पाहण्याची दृष्टी दिलीस त्या बद्दल धन्यवाद… इथून पुढे आम्ही प्रत्येक संकटाकडे वा दुःखाकडे नव्या आशेच्या किरणाने पहावे अशी दृष्टी आम्हाला दे… एक संधी म्हणून प्रत्येक संकटाकडे पाहण्याची बुद्धी दे… हे समर्था हि समज दिल्याबद्दल धन्यवाद… हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!